राहाता नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ हा आधीपासूनच नाट्यमय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलेला. काका-पुतण्यातील राजकीय तणाव, समर्थकांमधील सुटलेले सूर आणि दोन वेगवेगळ्या दिशेने धावणारी समीकरणे हे चित्र अनेक दिवसांपासून मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र बुधवारी मध्यरात्री अचानक झालेल्या निर्णयाने या संपूर्ण नाट्यामागचा पडदा एका क्षणात ढासळला.
अपक्ष म्हणून लढत असलेले राजेंद्र पाळंदे यांनी अखेर आपला सख्खा पुतण्या भाजप उमेदवार ऋषिकेश (मयूर) पाळंदे यांना जाहीर पाठिंबा देत प्रभाग ८ च्या राजकीय घडामोडिंना अचानक दिशा दिली. खात्रीशीर सूत्रांनुसार, या समझोत्यामागे सुजय दादा विखे पाटिल यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा असूनही यातील नेमके सत्य अजूनही धूसर आहे.
आता मोठा प्रश्न या नाट्यमय पाठिंब्याचा फायदा नेमका कोणाला? या प्रभागात ऋषिकेश पाळंदे यांच्या सह वसंत खरात, जयंत गायकवाड व अभिजित काळे हे तिन्ही उमेदवार जोरदार रिंगणात आहेत.
गायकवाड – संभाव्य धार गमावण्याचा धोका! गायकवाड यांना राजेंद्र पाळंदे यांच्या नाराजीमुळे “मूक मतांचे प्रवाह” मिळू शकले असते. परंतु ते समीकरण एका क्षणात बदलले. आता हा पाठिंबा पाळंदे यांच्या मतांमध्ये भर घालणार असल्याने गायकवाड यांची आघाडी कमी होण्याची शक्यता जाणकार चर्चेत मांडत आहेत.
काळे – ध्रुवीकरणाचा थेट परिणाम! राजेंद्र पाळंदे यांनी अपक्ष म्हणून मतांचे विभाजन घडवण्याची क्षमता होती. आता त्यांच्या पाठिंब्याने पाळंदे यांच्या मतांमध्ये झालेली मजबुती काळे यांच्यासाठी अडथळा ठरू शकते. ध्रुवीकरण पाळंदे यांच्या बाजूने झुकल्याने काळे यांची गणिते काहीशी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खरात – शांतपणे वाढत असलेला फायदा? राजेंद्र पाळंदे यांच्या निर्णयाने नाराज झालेल्या काही मूक मतदारांचा प्रवाह आता तिसऱ्या पर्यायाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकांमध्ये असे शांत, न बोलणारे पण निर्णायक ठरणारे मत “तिसऱ्या खेळाडूकडे” सरकतात या निवडणुकीत त्याचा फायदा खरात यांना होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
मतदारांचे एकच वाक्य “काकाचा पाठिंबा निश्चित झाला. पण नाराजीची दिशा कोणाच्या बाजूने वाहणार?”
काकापुतण्याची झालेली एकी निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट ठरला असला तरी खरी लढत आता सुरू झाली आहे. कोणाचे पारडे जड ठरणार – पाळंदे, खरात, गायकवाड की काळे – हे मतदारच ठरवणार. प्रभाग ८ मधील ही लढत आता अधिकच धारदार, रंगतदार आणि राजकीय दृष्ट्या निर्णायक बनली आहे.